- योगेश नवले
- देवगाव
- देवगाव
- अकोले
- अहमदनगर
- महाराष्ट्र
-
आदिवासी भागातील शेतीशी संबंधित सण ‘आखाजा’.
हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली तेव्हा त्याचा उद्देश फक्त आणि फक्त शेतीच होता. आजही आखाजात घरातल्या एका कोप-यात शेतातली माती आणून ती टोपल्यात पसरवली जाते. त्यात सप्तधान्य पेरलं जातं. त्यावर एक नवा कोरा मातीचा घडा/ मडकं ठेवलं जातं. त्यात रोज पाणी घातलं जातं. या घटातून पाणी झिरपत झिरपत सर्व मातीत मिसळतं आणि हळूहळू त्या बीजाला अंकुर येतात आणि त्याचं धान तयार होतं. सात दिवस हे घट ठेवले जातात.
एकदा का हे तृण उगवून आलं की घरातल्या मुली आखाजाच्या दिवशी हे घट घेऊन गावात चक्कर मारतात. काही ठिकाणी तर हा मुलींचा घोळका छान वाजत-गाजत मिरवतात आणि गावाच्या जवळच्या नदीवर जाऊन या सर्व घटांचं विसर्जन होतं. आता हा फक्त एक सण म्हणून शिल्लक राहिला आहे. प्रत्यक्षात याचा उद्देश चांगलं धान कोणतं हे शोधण्याचा आहे. याचा उपयोग येणा-या पावसाळ्यात स्वत:च्या शेतात लावण्यासाठी केला जाणार असतो. बीजाच्या तपासणीसाठी हा सण आहे. बरोबर पावसाळ्याच्या आधी आखाजा येतो. त्यातून जे धान स्वत:ला सिद्ध करतं त्यातून काय पेरायचं ते ठरतं. आमच्याकडच्या मुली जेव्हा हे धान घेऊन विसर्जनासाठी जातात तेव्हा ते धान डोक्याला लावायची एक पद्धत आहे. हे धान हात लावून पाहायला फारच छान असतं. खूप मऊ आणि अतिशय सुंदर रंग असतो याचा.
